79. अन् नाजियात - ٱلنَّازِعَات
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- शपथ आहे (त्या दूतांची) जे ओढून खेचून आणीत असतात.
- आणि हळूच काढून नेतात
- आणि (त्या दूतांची जे सृष्टीत) चपळाईने झेपावत असतात.
- मग (हुकुमाची अंमलबजावणी करण्यासाठी) चढाओढ करतात.
- मग (ईश्वरी आज्ञेनुसार) मामल्यांची व्यवस्था चालवितात.
- ज्या दिवशी हादरून सोडील भूकंपाचा झटका,
- आणि त्याच्या पाठोपाठ आणखी एक झटका बसेल,
- काही हृदये असतील ज्यांचा त्या दिवशी भयाने थरकाप उडत असेल,
- नजरा त्यांच्या भयभीत झाल्या असतील.
- ते लोक म्हणतात, ’’काय खरोखर आम्ही पूर्वीच्या स्थितीत पुन्हा परत आणले जाऊ?
- काय जेव्हा आम्ही जीर्ण हाडे बनलेले असू?’’
- म्हणू लागले, ’’हे परतणे मग तर फार तोट्याचे होईल.’’
- वस्तुतः ते केवळ इतके काम आहे की एक जोराची दर्डावणी होईल
- आणि अकस्मात ते खुल्या मैदानात हजर होतील.
- काय तुम्हाला मूसा (अ.) च्या कथेची वार्ता पोहोचली आहे?
- जेव्हा त्याच्या पालनकर्त्याने त्याला तुवाच्या पवित्र खोर्यात हांक दिली होती,
- ’’फिरऔन जवळ जा, तो दुराचारी झाला आहे,
- आणि त्याला सांग, काय तू यासाठी तयार आहेस की पवित्रता प्राप्त करावी
- आणि मी तुझ्या पालनकर्त्याकडे तुझे मार्गदर्शन करावे तर (त्याचे) भय तुझ्यात निर्माण होईल?’’
- मग मूसाने (अ.) (फिरऔनपाशी जाऊन) त्याला मोठा संकेत दाखविला
- परंतु त्याने खोटे ठरविले आणि मानले नाही,
- मग कुटील कारस्थान खेळण्यासाठी परतला
- आणि लोकांना गोळा करून त्याने सांगितले,
- ’’मी तुमचा सर्वश्रेष्ठ पालनकर्ता आहे.’’
- सरतेशेवटी अल्लाहने त्याला मरणोत्तर जीवन आणि जगाच्या प्रकोपात पकडले.
- वस्तुतः यात मोठा धडा आहे त्या प्रत्येक इसमासाठी जो भीत असेल.
- काय तुम्हा लोकांची निर्मिती अधिक कठीण काम आहे की आकाशाची? अल्लाहने ते बनविले
- त्याचे छत खूप उंच उठविले मग त्यांच्यात संतुलन प्रस्थापित केले.
- आणि त्याची रात्र झाकली आणि त्याचा दिवस उजाडला.
- त्यानंतर पृथ्वीला त्याने अंथरले.
- तिच्यातून तिचे पाणी व तिचा चारा काढला
- आणि पर्वत तिच्यात रोवले
- जीवनसामग्री म्हणून तुमच्यासाठी व तुमच्या जनावरांसाठी.
- मग जेव्हा तो मोठा हलकल्लोळ माजेल
- ज्या दिवशी मनुष्य आपले सर्व कर्म आठवील
- आणि प्रत्येक पहाणार्यासमोर नरक उघडून ठेवले जाईल.
- तर ज्याने दुराचार केला होता
- आणि जगातील जीवनाला प्राधान्य दिले होते,
- नरकच त्याचे ठिकाण असेल.
- आणि ज्याने आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्याचे भय बाळगले होते आणि मनाला वाईट इच्छेपासून दूर ठेवले होते,
- स्वर्ग त्याचे ठिकाण असेल.
- हे लोक तुम्हाला विचारतात की, ’’अखेर ती घटका केव्हा येऊन ठेपेल?’’
- तुमचे काय काम, की तिची वेळ सांगावी.
- तिचे ज्ञान तर अल्लाहवर समाप्त आहे.
- तुम्ही केवळ खबरदार करणारे आहात त्या प्रत्येक इसमाला जो तिचे भय बाळगीत असेल.
- ज्या दिवशी हे लोक तिला पाहतील तर त्यांना असे वाटेल की (जगात आणि मृतावस्थेत) हे केवळ एका दिवसाच्या शेवटच्या अथवा पहिल्या प्रहरापर्यंत थांबले आहेत.