3.आलि इम्रान - آلِ عِمْرَان
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- अलिफ, लाऽऽम, मीऽऽम.
- अल्लाह तो चिरंजीवी अस्तित्व ज्याने सृष्टीची व्यवस्था सांभाळली आहे. खरोखरच त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही.
- हे पैगंबर (स.), त्याने तुमच्यावर हा ग्रंथ अवतरला जो सत्य घेऊन आला आहे व त्या ग्रंथांच्या सत्यतेची साथ देत आहे, जे पूर्वी अवतरले होते. यापूर्वी त्याने मानवांच्या मार्गदर्शनाकरिता तौरात व इन्जील अवतीर्ण केले आहे.
- आणि त्याने ती कसोटी अवतीर्ण केली आहे, (जी सत्य आणि असत्य यातील फरक दर्शविणारी आहे.) आता जे लोक अल्लाहचा आदेश स्वीकारण्यास नकार देतील त्यांना निश्चितच कठोर शिक्षा मिळेल. अल्लाह अमर्याद शक्तीचा स्वामी आणि दुष्कर्मांचा बदला घेणारा आहे.
- पृथ्वी आणि आकाशांतील कोणतीही वस्तू अल्लाहपासून लपलेली नाही.
- तोच तर आहे, जो तुमच्या मातेच्या गर्भाशयात तुमचा आकार हवा तसा घडवितो, त्या जबरदस्त बुद्धिमानाशिवाय इतर कोणी ईश्वर नाही.
- तोच ईश्वर आहे, ज्याने हा ग्रंथ तुमच्यावर अवतरला आहे. या ग्रंथात दोन प्रकारची वचने आहेत. एक निर्णायक आहेत, जी ग्रंथाचा मूळ आधार आहेत. आणि दुसरी संदिग्ध, ज्या लोकांच्या मनात तेढ आहे, ते नेहमी अनाचाराच्या शोधात ’संदिग्ध’तेचाच पाठपुरावा करीत असतात आणि त्यांना अर्थाचा मुलामा देण्याचा प्रयत्न करीत असतात. वास्तविक पाहता त्यांचा खरा अर्थ अल्लाहशिवाय कोणासही ठाऊक नाही. याउलट जे लोक ज्ञानाने परिपक्व आहेत ते म्हणतात की, ’’आमची यांच्यावर श्रद्धा आहे, ह्या सर्व आमच्या पालनकर्त्याकडूनच आलेल्या आहेत.’’ आणि सत्य असे आहे की, एखाद्या गोष्टीपासून खरा बोध केवळ बुद्धिमान लोकच ग्रहण करतात.
- ते अल्लाहजवळ प्रार्थना करीत असतात की, ’’हे पालनकर्त्या! जेव्हा तू आम्हास सरळ मार्गावर आणले आहेस तर आमची मने वक्रतेत गुंतवू नकोस. आम्हाला तुझ्या औदार्याच्या भांडारातून कृपा प्रदान कर, कारण तूच खर्या अर्थाने उदार आहेस.
- हे पालनकर्त्या, निःसंशय तू एके दिवशी सर्व लोकांना एकत्रित करणार आहेस, ज्या दिवसाच्या आगमनाबद्दल कसलीही शंका नाही, तू आपल्या वचनापासून मुळीच ढळणारा नाहीस.’’
- ज्या लोकांनी द्रोहाचा मार्ग अवलंबिला आहे, त्यांना अल्लाहपासून वाचविण्यासाठी त्यांची धनसंपत्ती उपयोगी पडणार नाही किंवा त्यांची संततीदेखील. ते (नरकाग्नी)चे इंधन बनून राहतील.
- त्यांचा शेवट तसाच होईल, जसा फिरऔनचे सोबती व त्यांच्या पूर्वी अवज्ञा करणार्यांचा झाला आहे. कारण त्यांनी अल्लाहच्या संकेतांना खोटे ठरविले. परिणामस्वरूप अल्लाहने त्यांच्या अपराधांसाठी त्यांना पकडले आणि सत्य असे आहे की अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे.
- म्हणून हे पैगंबर (स.), ज्या लोकांनी तुमचे आवाहन मान्य करण्यास नकार दिला आहे, त्यांना सांगून टाका की, ती वेळ जवळच आहे जेव्हा तुम्ही पराभूत व्हाल, व नरकाकडे तुम्हांस हाकून नेले जाईल, व नरक फारच वाईट स्थान आहे
- त्या दोन्ही गटांमध्ये तुमच्यासाठी बोधचिन्ह होते, जे (बदरच्या युद्धात) एक दुसर्याशी भिडले. एक गट अल्लाहच्या मार्गात लढत होता आणि दुसरा गट द्रोह करणारा होता. पाहणारे उघड्या डोळ्यांनी पाहात होते की, द्रोह करणार्यांचा गट मुसलमानांच्या गटापेक्षा दुप्पट आहे. पण (परिणामाने सिद्ध करून दाखविले की) अल्लाह आपल्या विजयाने व सहाय्याने हवे त्याला मदत देतो. डोळसपणा बाळगणार्यांसाठी त्यामध्ये उत्तम बोध दडलेला आहे.
- लोकांकरिता वासनाप्रिय गोष्टी,- स्त्रिया, संतती, सोन्या-चांदीचे ढीग, निवडक घोडे, पशू आणि शेतजमिनी- अत्यंत मोहक बनविल्या गेल्या आहेत, पण या सर्व वस्तू तर क्षणिक ऐहिक जीवनाची सामग्री आहे. खरे पाहता जे सर्वोत्तम ठिकाण आहे, ते अल्लाहजवळ आहे.
- त्यांना सांगा! यापेक्षा अधिक चांगली वस्तू काय आहे, ते सांगू? जे लोक अल्लाहच्या कोपाचे भय बाळगून वागतील, त्यांच्यासाठी त्यांच्या पालनकर्त्याजवळ उद्याने आहेत ज्यांच्याखालून कालवे वाहत असतील, तेथे त्यांना चिरकालीन जीवन प्राप्त होईल. पवित्र पत्नीं त्यांच्या सोबती असतील आणि त्या अल्लाहच्या प्रसन्नतेने मान्यवर होतील. अल्लाह आपल्या दासांच्या वागणुकीवर देखरेख ठेवतो.
- हे ते लोक आहेत जे म्हणतात की, ’’हे स्वामी, आम्ही श्रद्धा ठेवतो आमच्या अपराधांबद्दल क्षमा कर आणि आम्हाला नरकाग्नीपासून वाचव.’’
- हे लोक संयमी आहेत, सत्यनिष्ठ आहेत, आज्ञाधारक व दानशूर आहेत, आणि रात्रीच्या अंतिम प्रहरी अल्लाहजवळ क्षमायाचना करीत असतात.
- अल्लाहने स्वतः या गोष्टीची ग्वाही दिली आहे की त्याच्याशिवाय कोणीही परमेश्वर नाही, आणि फरिश्ते व सर्व ज्ञान राखणारेसुद्धा रास्त व न्यायनीतीने यांची ग्वाही देतात की, त्या प्रभावशाली बुद्धीमंताशिवाय खरे पाहता कोणीही ईश्वर नाही.
- अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे. या ’दीन’पासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही.
- आता हे पैगंबर (स.), हे लोक जर तुमच्याशी भांडण करतील तर त्यांना सांगा, ’’मी आणि माझ्या अनुयायांनी तर अल्लाहसमोर मान तुकविली आहे.’’ मग ग्रंथधारक व बिगर ग्रंथधारी दोघांना विचारा, ’’काय तुम्हीही त्याची आज्ञाधारकता व दास्यत्व स्वीकारले?’ जर त्यांनी स्वीकारले तर त्यांना सरळ मार्ग प्राप्त झाला. जर त्यापासून पराडमुख झाले तर, तुमच्यावर फक्त संदेश पोहचविण्याची जबाबदारी होती. पुढे तर अल्लाह स्वतःच आपल्या सर्व दासांचे व्यवहार पाहणारा आहे.
- जे लोक अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचना मान्य करण्यास नकार देतात आणि त्याच्या पैगंबरांना हकनाक ठार करतात आणि अशा लोकांच्या जीवावर उठतात जे मानवमात्रापैकी न्यायनीती व रास्तपणाचा आदेश देण्याकरिता पुढे येतात, त्यांना दुखदायक शिक्षेची वार्ता ऐकवा.
- हेच ते लोक होत, ज्यांची कर्मे इहलोकात व परलोकात, दोहोंमध्ये वाया गेली आणि त्यांचा सहायक कोणी नाही.
- तुम्ही पाहिले नाही की, ज्या लोकांना ग्रंथाच्या ज्ञानातून काही भाग मिळाला आहे, त्यांची अवस्था काय आहे? जेव्हा त्यांना अल्लाहच्या ग्रंथाकडे बोलाविले जाते, याकरिता की त्याने त्यांच्या दरम्यान निर्णय द्यावा, तेव्हा त्यांच्यापैकी एक गट त्याला बगल देतो व त्या निर्णयाकडे येण्यापासून विमुख होतो.
- त्यांची ही वर्तणूक या कारणास्तव आहे की, ते म्हणतात नरकाग्नी तर आम्हाला स्पर्शदेखील करणार नाही. आणि नरकाची शिक्षा मिळालीच, तर फक्त काही दिवस. त्यांच्या तथाकथित श्रद्धांनी त्यांना त्याच्या धर्माच्या बाबतीत भयंकर चुकीच्या समजुतीत गुंतविले आहे.
- मग काय ओढवेल त्यांच्यावर, जेव्हा आम्ही त्यांना त्या दिवशी एकत्र करू, ज्या दिवसाचे आगमन निश्चित आहे? त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला तिच्या कमाईचा बदला पुरेपूर दिला जाईल व कोणावरही अत्याचार होणार नाही.
- सांगा, ’’हे अल्लाह समस्त राज्याच्या स्वामी! तू हवे त्याला राज्य देतोस व हवे त्याकडून हिरावून घेतोस. हवे त्याला प्रतिष्ठा प्रदान करतोस व हवे त्याला अपमानित करतोस. कल्याण तुझ्याच अखत्यारित आहे. निःसंशय, तू प्रत्येक गोष्टीला समर्थ आहेस
- तू रात्रीला दिवसात ओवीत आणतोस आणि दिवसाला रात्रीत, निर्जिवातून सजीवास, बाहेर काढतोस व सजिवातून निर्जिवास व ज्याला इच्छितोस त्याला उदंड उपजीविका देतोस.
- श्रद्धावानांनी, श्रद्धावानांना सोडून अश्रद्धावानांना आपला मित्र-सोबती व सहायक मुळीच बनवू नये. जो असे करील त्याचा अल्लाहशी काही संबंध नाही. होय, त्यांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी सकृतदर्शनी जर तुम्ही अशी कार्यपद्धती अवलंबिली तर ती क्षम्य आहे. परंतु अल्लाह तुम्हाला आपले स्वतःचे भय दाखवितो आणि तुम्हाला त्याच्याकडेच परत जावयाचे आहे.
- हे नबी! लोकांना माहिती करून द्या की, तुमच्या मनात जे काही आहे त्याला गुप्त ठेवा अथवा प्रकट करा प्रत्येक स्थितीत अल्लाह ते जाणतो, पृथ्वी व आकाशामधील कोणतीही वस्तू त्याच्या ज्ञानकक्षेबाहेर नाही आणि त्याची सत्ता प्रत्येक वस्तूवर प्रभावी आहे.
- तो दिवस उगवणार आहे, जेव्हा प्रत्येक सजीवाला आपल्या कृतीचे फळ उपलब्ध असल्याचे आढळेल मग त्याने पुण्य केले असो अथवा पाप, त्या दिवशी मनुष्य अशी कामना करील की, किती छान झाले असते, जर हा दिवस अद्याप त्याच्यापासून फार दूर असता! अल्लाह तुम्हाला आपल्या स्वतःचे भय दाखवतो आणि तो आपल्या दासांचा अत्यंत हितचिंतक आहे.
- हे पैगंबर (स.)! लोकांना सांगून टाका, ’’जर तुम्ही खरोखर अल्लाहवर प्रेम करीत असाल, तर माझे अनुकरण करा, अल्लाह तुमच्यावर प्रेम करील आणि तुमच्या अपराधांना क्षमा करील, तो अत्यंत क्षमाशील व परम कृपाळू आहे.’’
- त्यांना सांगा! ’’अल्लाह व पैगंबरांचे आज्ञाधारक बना.’’ मग जर त्यांनी तुमचे आवाहन स्वीकारले नाही तर अल्लाह अवज्ञा करणार्यांवर प्रेम करत नाही.’’
- अल्लाहने आदम (अ.) आणि नूह (अ.) आणि इब्राहीम (अ.) ची संतान व इम्रानची संतान यांना सर्व दुनियेवर प्राधान्य देऊन (आपल्या प्रेषितपदाकरिता) निवडले होते.
- हे एका परंपरेचे लोक होते जे एक दुसर्याच्या वंशापासून जन्मले होते. अल्लाह सर्वकाही ऐकतो व जाणतो.
- (तो त्या वेळेस ऐकत होता) जेव्हा इम्रानची पत्नी सांगत होती, ’’हे माझ्या पालनकर्त्या! मी हे मूल जे माझ्या पोटात आहे, तुला अर्पण करते. ते तुझ्याच कार्याकरिता समर्पित असेल, माझी ही भेट स्वीकार कर. तू ऐकणारा व जाणणारा आहेस.’’
- मग जेव्हा ती मुलगी तिच्या पोटी जन्मास आली तेव्हा तिने सांगितले, ’’हे पालनकर्त्या! माझ्या पोटी तर मुलगी जन्मली आहे - तिने कोणास जन्म दिला हे अल्लाहला ज्ञात होते. - आणि मुलगा मुलीसारखा असत नाही. बरे असो हिचे नाव ’मरयम’ ठेविले आहे. आणि मी तिला आणि तिच्या भावी संततीला धिक्कारल्या गेलेल्या शैतानाच्या उपद्रवापासून तुझ्या संरक्षणात देते.’’
- सरतेशेवटी तिच्या पालनकर्त्याने त्या मुलीचा, प्रसन्नतेने स्वीकार केला. तिचे खूप चांगली मुलगी म्हणून संगोपन केले आणि जकरिय्याला तिचे पालक बनविले. जकरिय्या जेव्हा तिच्याजवळ महिरपमध्ये जात असे तेव्हा तिच्याजवळ काही ना काही खाण्यापिण्याच्या वस्तू त्याला आढळत असत. तो विचारत असे, ’’मरयम, हे तुझ्याजवळ कोठून आले?’’ ती उत्तर देत असे, ’’अल्लाहकडून आले आहे.’’ अल्लाह ज्याला इच्छितो त्याला अमर्याद देतो.
- ही अगणित उपजीविका पाहून जकरिय्याने आपल्या पालनकर्त्याचा धावा केला आणि म्हणाला, ’’हे प्रभू! आपल्या सामर्थ्याने मला प्रामाणिक संतान प्रदान कर, तूच प्रार्थना ऐकणारा आहेस.’’
- उत्तरादाखल ईशदूतांनी त्याला हाक दिली जेव्हा तो महिरपमध्ये उभा, नमाज अदा करीत होता, ’’अल्लाह तुला ’यहया’ची शुभवार्ता देत आहे. तो अल्लाहच्या शब्दाचे समर्थन करणारा म्हणून येईल. तो अल्लाहकडून एका आदेशाची सत्यता प्रमाणित करणारा म्हणून येईल. आणि त्याच्यापाशी सरदारकी आणि श्रेष्ठत्वाची शान असेल. कमाल दर्जाची शिस्तबद्धता असेल. प्रेषितत्वाने भूषविला जाईल आणि सदाचारी लोकांत गणला जाईल.’’
- जकरिय्या म्हणाला, ’’हे पालनकर्त्या! मला पुत्र कसा काय होणार बरे, मी तर वृद्ध झालो आहे आणि माझ्या पत्नीला तर वंध्यत्व आहे.’’ उत्तर मिळाले, ’’असेच होईल. अल्लाह जे इच्छितो ते करतो.’’
- त्याने विचारले, ’’स्वामी! मग एखादे संकेतचिन्ह माझ्याकरिता निश्चित कर.’’ सांगितले, ’’संकेतचिन्ह हे आहे की तू तीन दिवसांपर्यंत लोकांशी संकेताविना कोणतेही संभाषण करणार नाहीस (अथवा करू शकणार नाहीस.) या कालावधीत आपल्या पालनकर्त्याचे खूप स्मरण करीत राहा आणि सकाळ संध्याकाळ त्याचे पावित्र्यगान करीत रहा.’’
- मग ती वेळ येऊन ठेपली जेव्हा ईशदूतांनी येऊन मरयमला सांगितले, ’’हे मरयम! अल्लाहने तुझी निवड केली व तुला पावित्र्य दिले आणि जगातील सर्व स्त्रियांवर तुला प्राधान्य देऊन आपल्या सेवेकरिता निवडले.
- हे मरयम! आपल्या पालनकर्त्याशी आज्ञाधारक बनून राहा, त्याच्या पुढे नतमस्तक होत राहा व जे दास त्याच्या पुढे झुकणारे आहेत त्यांच्याबरोबर तूसुद्धा झुकत जा.’’
- (हे पैगंबर (स.)!) या परोक्षाच्या वार्ता आहेत ज्या आम्ही तुम्हाला दिव्यप्रकटनाद्वारे कळवीत आहोत, एरवी तुम्ही त्यावेळी त्या ठिकाणी हजर नव्हता, जेव्हा हैकलचे सेवक हा निर्णय घेण्याकरिता की मरयमचा पालक कोण असावा, यासाठी आपापले फांसे फेकत होते. आणि त्यावेळी देखील तुम्ही हजर नव्हता जेव्हा त्यांच्या दरम्यान भांडण होत होते.
- आणि जेव्हा दूतांनी म्हटले, ’’हे मरयम, अल्लाह तुला आपल्या एका आदेशाची शुभवार्ता देत आहे. त्याचे नांव मरयमपुत्र, मसीह ईसा असेल व तो इहलोक व परलोकात प्रतिष्ठित राहील, अल्लाहच्या निकटवर्ती दासांमध्ये त्याची गणना होईल.
- तो लोकांशी पाळण्यातदेखील संभाषण करील आणि मोठा होऊनसुद्धा, आणि तो एक सदाचारी पुरुष असेल.’’
- हे ऐकून मरयम म्हणाली, ’’हे पालनकर्त्या, मला मूल कसे होणार? मला तर कोणा पुरुषाने स्पर्ष देखील केला नाही.’’ उत्तर मिळाले, ’’असेच होईल. अल्लाह जे इच्छितो ते निर्माण करतो. तो जेव्हा एखादे कार्य करण्याचा निर्णय घेतो तेव्हा फक्त म्हणतो की, ’हो’ तर ते होते.’’
- (ईशदूतांनी पुन्हा आपल्या संभाषणाच्या ओघात म्हटले) ’’आणि अल्लाह त्याला ग्रंथ व विवेकाची शिकवण देईल, तौरात व इन्जीलचे शिक्षण देईल,
- आणि त्याला बनीइस्राईलसाठी आपला प्रेषित नियुक्त करील.’’ (आणि जेव्हा तो प्रेषित म्हणून बनीइस्राईलपाशी आला तेव्हा त्याने सांगितले) ’’मी तुमच्या पालनकर्त्याकडून तुम्हापाशी संकेतचिन्ह घेऊन आलो आहे. मी तुमच्यासमोर मातीपासून पक्ष्याच्या आकाराचा एक पुतळा तयार करतो आणि त्याला फुंकर मारतो. तो अल्लाहच्या आदेशाने पक्षी बनतो. मी अल्लाहच्या आज्ञेने जन्मजात आंधळ्याला व महारोग्याला बरे करतो आणि त्याच्या आज्ञेने मृताला जिवंत करतो. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय खाता आणि आपल्या घरांत काय साठा करून ठेवता. यात तुमच्यासाठी पुरेशी निशाणी आहे जर तुम्ही श्रद्धावंत असाल.
- आणि मी ती शिकवण व त्या मार्गदर्शनाचे समर्थन करण्यासाठी आलो आहे जे यापूर्वीच्या तौरातमध्ये विद्यमान आहे, आणि यासाठी आलो आहे की तुम्हासाठी काही अशा वस्तुना मी वैध करावे ज्या तुम्हासाठी निषिद्ध करण्यात आल्या आहेत. पहा, मी तुमच्या पालनकर्त्याकडून तुम्हापाशी संकेत घेऊन आलो आहे, म्हणून अल्लाहचे भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळा.
- अल्लाह माझाही पालनकर्ता आहे व तुमचा पालनकर्तासुद्धा. म्हणून तुम्ही त्याचीच भक्ती करा हाच सरळ मार्ग आहे.
- जेव्हा ईसा (अ.) ला जाणवले की बनीइस्राईल नाकारण्यामध्ये तत्पर आहेत तेव्हा त्याने सांगितले, ’’कोण अल्लाहच्या मार्गात माझा सहायक बनेल?’’ हवारींनी उत्तर दिले, ’’आम्ही अल्लाहचे सहायक आहोत, आम्ही अल्लाहवर श्रद्धा ठेवली, साक्षी राहा की आम्ही मुस्लिम (अल्लाहच्या आज्ञेपुढे नतमस्तक होणारे) आहोत.
- स्वामी! जे फर्मान तू अवतरले आहेस, आम्ही त्याला मानतो आणि प्रेषिताचे अनुसरण स्वीकारतो. आमची नावे ग्वाही देणार्यांमध्ये समाविष्ट कर.’’
- नंतर बनीइस्राईल (येशू मसीहच्याविरूद्ध) गुप्त कारस्थान करू लागले. उत्तरादाखल अल्लाहनेदेखील आपला गुप्त डाव योजिला आणि असे डाव योजण्यात अल्लाह सर्वात वरचढ आहे.
- (ती अल्लाहची गुप्त युक्तीच होती) जेव्हा त्याने सांगितले की, ’’हे ईसा (अ.), मी आता तुला परत घेईन आणि तुला माझ्याकडे उचलून घेईन व ज्यानी तुला नाकारले आहे त्यांच्यापासून (म्हणजे त्यांच्या सहवासातून व घाणेरड्या वातावरणातील, त्यांच्या संगतीत राहण्यापासून) तुला पवित्र करीन आणि तुझे अनुसरण करणार्यांना पुनरुत्थानापर्यंत त्या लोकांवर वरचढ ठेवीन ज्यांनी तुला नाकारले आहे. मग सरतेशेवटी तुम्हां सर्वांना माझ्याकडे यावयाचे आहे. तेव्हा मी गोष्टींचा निर्णय देईन ज्या संबंधी तुम्हा दरम्यान मतभेद निर्माण झाला आहे.
- ज्या लोकांनी नाकारण्याचा मार्ग अंगिकारला आहे त्यांना इहलोक व परलोक दोहोंमध्ये कठोर शिक्षा देईन. आणि त्यांना कोणीही सहायक मिळणार नाही.
- आणि ज्यांनी श्रद्धा व सद्वर्तनाचे आचरण केले आहे, त्यांना त्यांचे मोबदले पुरेपूर दिले जातील. आणि (पक्के जाणून घ्या की) अल्लाह अत्याचारी लोकांवर कदापि प्रेम करीत नाही.’’
- हे पैगंबर (स.), संकेतवचने व बुद्धिमत्तेने ओतप्रोत वर्णने आहेत जी आम्ही तुम्हाला ऐकवीत आहोत.
- अल्लाहपाशी ईसा (अ.) चे उदाहरण आदम (अ.) सारखेच आहे की अल्लाहने त्याला मातीपासून निर्माण केले आणि आज्ञा दिली की अस्तित्वात ये आणि त्याचे अस्तित्व प्रत्यक्षात आले.
- ही वस्तुस्थिती आहे जी तुमच्या पालनकर्त्याकडून सांगण्यात येत आहे. आणि तुम्ही त्या लोकांत सामील होऊ नका जे यांच्यात शंका घेतात.
- हे ज्ञान आल्यानंतर आता याबाबतीत तुमच्याशी जो कोणी वाद घालत असेल तर हे प्रेषित, त्याला सांगा की, ’’या, आमची मुलेबाळे व तुमची मुलेबाळे आमच्या स्त्रिया व तुमच्या स्त्रिया, तसेच तुम्ही आणि आम्ही, आपण सर्व येऊया आणि अल्लाहजवळ सांगू या की, जो खोटा असेल त्याच्यावर अल्लाहचा कोप होवो. (अल्लाहकडून धिक्कार होवो.)’’
- या अगदी खर्या घटना आहेत आणि वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहशिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही आणि ते अस्तित्व केवळ अल्लाहचेच आहे ज्याची शक्ती सर्वांपेक्षा वरचढ आहे व ज्याची बुद्धिमत्ता विश्वव्यवस्थेत कार्यरत आहे.
- मग जर हे लोक (या अटीवर सामना करण्यापासून) पराडमुख होतील तर (त्यांचे द्रोही असणे स्पष्टपणे उघडकीस येईल) आणि अल्लाह तर विद्रोहीच्या स्थितीशी परिचित आहेच.
- (हे पैगंबर (स.)!) सांगा, ’’हे ग्रंथधारकानो या, एका अशा बाबीकडे जी आमच्या आणि तुमच्या दरम्यान समान आहे, हे की आपण अल्लाहशिवाय कोणाचीही भक्ती करू नये, त्याच्याबरोबर कोणासही भागीदार ठरवू नये, आणि आपल्यापैकी कोणीही अल्लाहशिवाय इतर कोणास आपला पालनकर्ता बनवू नये.’’ या आवाहनाला स्वीकारण्यापासून ते जर पराडमुख झाले तर स्पष्ट सांगून टाका की साक्षी राहा आम्ही तर मुस्लिम (केवळ अल्लाहची भक्ती करणारे व त्याचे आज्ञापालन करणारे) आहोत.
- हे ग्रंथधारकानो, तुम्ही इब्राहिम (अ.) च्या (धर्मा) संबंधी आमच्याशी का वाद घालता? तौरात व इंजील हे ग्रंथ तर इब्राहिम नंतरच उतरले आहेत. मग काय तुम्हाला एवढीशी गोष्टदेखील कळत नाही.
- तुम्हा लोकांना ज्या गोष्टीचे ज्ञान आहे त्यावर तर तुम्ही खूप वादंग माजविले, आता त्याबाबतीत विवाद का करू पाहता ज्यांचे तुम्हापाशी काहीच ज्ञान नाही. अल्लाह जाणतो. तुम्ही जाणत नाही.
- इब्राहिम (अ.) यहुदीही नव्हता की ख्रिस्तीदेखील नव्हता किंबहुना तो तर एक प्रामाणिक मुस्लिम होता आणि तो कदापि अनेकेश्वरवाद्यांपैकी नव्हता.
- इब्राहिम (अ.) शी संबंध ठेवण्याचा सर्वाधिक हक्क जर कोणाला पोहचतो तर तो त्या लोकांना पोहचतो ज्यांनी त्याचे अनुकरण केले. आणि आता हे प्रेषित (स.) आणि याचे अनुयायी या संबंधाचे अधिक हक्कदार आहेत. अल्लाह केवळ त्यांचाच समर्थक व मदतगार आहे जे श्रद्धा ठेवतात.
- (हे श्रद्धावानांनो) ग्रंथधारकांपैकी एक गट इच्छितो की येनकेनप्रकारेण तुम्हाला सरळ मार्गापासून दूर करावे. वास्तविक पाहता ते आपल्याशिवाय इतर कोणासही मार्गभ्रष्ट करीत नाहीत. परंतु त्यांना याचा विवेक नाही.
- हे ग्रंथधारकांनो, अल्लाहचे संकेत नाकारता, वास्तविक पाहता तुम्ही स्वतः त्यांचे निरीक्षण करीत आहात?
- हे ग्रंधारकांनो, सत्यावर असत्याचा रंग चढवून त्याला का शंकास्पद बनविता? जाणूनबुजून सत्याला का लपविता?
- ग्रंथधारकांपैकी एक गट म्हणतो की या पैगंबराला मानणार्या लोकांवर जे काही अवतरले आहे, त्यावर सकाळी श्रद्धा ठेवा व संध्याकाळी ते नाकारा. कदाचित या युक्तीने हे लोक आपल्या श्रद्धेपासून परावृत्त होतील.
- तसेच हे लोक आपापसात म्हणतात की स्वधर्मीयांशिवाय कोणाचेही ऐकू नका. हे पैगंबर (स.), यांना सांगा, ’’वास्तविक मार्गदर्शन तर अल्लाहचेच मार्गदर्शन होय. आणि ही त्याचीच देणगी आहे की एखाद्याला तेच काही दिले जाते जे कधी तुम्हाला दिले गेले होते किंवा असे की इतरांना तुमच्या पालनकर्त्यापुढे रुजू करण्यासाठी तुमच्याविरूद्ध भक्कम प्रमाण मिळावे.’’ हे पैगंबर (स.), यांना सांगा की, ’’कृपा व प्रतिष्ठा अल्लाहच्या अखत्यारित आहे. हवे त्याला त्याने ती प्रदान करावी. तो उदार दृष्टीचा आहे. व तो सर्वज्ञ आहे.
- आपल्या कृपेसाठी हवे त्याला निवडतो आणि त्याची कृपा अतिमहान आहे.’’
- ग्रंथधारकांमध्ये कुणी असा आहे की तुम्ही त्याच्या विश्वासावर गडगंज संपत्ती दिली तरी तो तुमची संपत्ती तुम्हाला अदा करील, आणि कुणाची अवस्था अशी आहे की तुम्ही एका दीनारच्या बाबतीत जरी त्याच्यावर विश्वास ठेवला तरी तो याशिवाय अदा करणार नाही की तुम्ही त्याच्या मानगुटीवर बसाल. त्यांच्या या नैतिक अवस्थेचे कारण असे आहे की ते सांगतात, ’’उम्मी (यहुदी-ज्यू खेरीज इतर लोक) लोकांच्या बाबतीत आमची काही विचारणा होणार नाही.’’ आणि ही गोष्ट ते केवळ खोटी रचून तिचा संबंध अल्लाहशी जोडतात. खरे पाहता त्यांना माहीत आहे (की अल्लाहने अशी कोणतीही गोष्ट फर्माविली नाही.) बरे त्यांची विचारणा का होणार नाही?
- जो कोणी आपले वचन पूर्ण करील व वाईट गोष्टींपासून दूर राहील तो अल्लाहचा प्रिय बनेल, कारण ईशपरायण लोक त्याला प्रिय आहेत.
- उरले ते लोक जे अल्लाहशी केलेला करार व आपल्या शपथा अल्पशा किमतीवर विकून टाकतात तर त्यांच्यासाठी पारलौकिक जीवनात कोणताही वाटा नाही. अल्लाह कयामतच्या दिवशी त्यांच्याशी बोलणारही नाही, त्यांच्याकडे पाहणारही नाही आणि त्यांना पवित्रही करणार नाही किंबहुना त्यांच्यासाठी तर अत्यंत यातनादायक शिक्षा आहे.
- त्यांच्यात काही लोक असे आहेत जे ग्रंथ वाचताना अशाप्रकारे जीभ वेडीवाकडी वळवितात की तुम्ही समजावे जे काही ते वाचत आहेत ते ग्रंथातीलच मजकूर होय, वास्तविक पाहता तो मजकूर ग्रंथातील नसतो. ते म्हणतात की हे जे काही आम्ही वाचत आहोत हे अल्लाहकडून आहे. खरे पाहता ते अल्लाहकडून असत नाही, ते जाणूनबुजून असत्य गोष्टीचा संबंध अल्लाहशी जोडतात.
- कोणत्याही माणसाचे हे काम नव्हे की अल्लाहने त्याला ग्रंथ आणि आज्ञा व प्रेषितत्व प्रदान करावे आणि त्याने लोकांना म्हणावे की अल्लाहऐवजी तुम्ही माझे दास बना. तो तर हेच म्हणेल की खर्या अर्थी रब्बानी (धर्मोपदेशक) बना, जशी त्या ग्रंथाच्या शिकवणीची अपेक्षा आहे ज्याचे तुम्ही पठण करता व पाठ देता.
- तो तुम्हाला कदापि असे सांगणार नाही की अल्लाहच्या दूतांना अथवा प्रेषितांना आपला पालनकर्ता माना हे शक्य आहे का की एखाद्या प्रेषिताने तुम्हाला ईशद्रोहाची आज्ञा द्यावी जेव्हा तुम्ही आज्ञाधारी असाल.
- स्मरण करा, अल्लाहने प्रेषितांकडून वचन घेतले होते, की आज मी तुम्हाला ग्रंथ, विवेक व बुद्धीमत्तेने उपकृत केले आहे. उद्या जर एखादा दुसरा प्रेषित तुमच्याजवळ त्याच शिकवणीची ग्वाही देणारा आला जी शिकवण अगोदरपासूनच तुमच्याजवळ आहे तर तुम्हाला त्याच्यावर श्रद्धा ठेवावी लागेल आणि त्याला सहकार्य द्यावे लागेल. असे फर्मावून अल्लाहने विचारले, ’’काय तुम्ही हे मान्य करता आणि यावर माझ्यातर्फे कराराची मोठी जबाबदारी उचलता?’’ त्यांनी सांगितले, ’’होय, आम्ही मान्य करतो.’’ अल्लाहने फर्माविले, ’’मग साक्षी राहा आणि मी देखील तुमच्याबरोबर साक्षी आहे.
- यानंतर जो आपल्या करारापासून पराङमुख होईल तो अवज्ञाकारी आहे.’’
- आता का हे लोक अल्लाहच्या आज्ञापालनाची पद्धत (अल्लाहचा दीन) सोडून इतर एखादी पद्धत इच्छितात? वास्तविक पाहता आकाश व पृथ्वीमध्ये जे जे काही आहे ते आपणहून किंवा अपरिहार्यपणे अल्लाहला समर्पित झाले आहेत. आणि त्याच्याकडे सर्वांना रुजू व्हायचे आहे?
- हे पैगंबर (स.), सांगा की, ’’आम्ही अल्लाहला मानतो, त्या शिकवणींना मानतो जी आम्हांवर उतरली आहे. त्या शिकवणीला देखील मान्य करतो ज्या इब्राहिम (अ.), इस्माईल (अ.), इसहाक (अ.), याकूब (अ.) आणि याकूब (अ.) च्या संततीवर उतरल्या होत्या आणि त्या आदेशांवर देखील श्रद्धा ठेवतो जे मूसा (अ.) व ईसा (अ.) आणि इतर प्रेषितांना त्यांच्या पालनकर्त्याकडून दिले गेले. आम्ही त्यांच्यापैकी एकाच्यामध्ये भेदभाव करीत नाही. आणि आम्ही अल्लाहच्या आदेशांच्या अधीन (मुस्लिम) आहोत.’’
- या आज्ञाधारकते (इस्लाम) शिवाय जो कोणी अन्य एखादा धर्म (जीवनपद्धत) अंगिकारत असेल, त्याची ती जीवनपद्धत कदापि स्वीकारली जाणार नाही व मरणोत्तर जीवनामध्ये तो अयशस्वी व विफल होईल.
- कसे शक्य आहे की, अल्लाह त्या लोकांना मार्गदर्शन प्रदान करील ज्यांनी श्रद्धेची देणगी मिळाल्यानंतर पुन्हा द्रोहाचा अंगिकार केला. वास्तविक पाहता त्यांनी स्वतः या गोष्टींची ग्वाही दिलेली आहे की हा पैगंबर सत्याधिष्ठित आहे. आणि त्या लोकांपर्यंत उज्ज्वल संकेतवचनेदेखील पोहचली आहेत. अल्लाह तर अत्याचार्यांना मार्गदर्शन करीत नसतो.
- त्यांच्या अत्याचाराची योग्य शिक्षा तर हीच आहे की त्यांच्यावर अल्लाह आणि दूत व समस्त माणसांचा शाप आहे.
- अशाच स्थितीत ते सदैव राहतील, त्यांच्या शिक्षेत सूटही मिळणार नाही किंवा त्यांना सवडदेखील दिली जाणार नाही.
- तथापि ते लोक वाचतील जे लोक यानंतर तौबा (पश्चात्ताप) करून आपल्या आचरणात सुधारणा करतील, अल्लाह क्षमा करणारा व कृपा करणारा आहे.
- परंतु ज्या लोकांनी श्रद्धा ठेवल्यानंतर अश्रद्धेचा अंगिकार केला आणि अश्रद्धेतच पुढे जात राहिले त्यांचा पश्चात्ताप कदापि स्वीकारला जाणार नाही, असले लोक तर पक्के मार्गभ्रष्ट आहेत.
- खात्री बाळगा, ज्या लोकांनी अश्रद्धेचा अंगिकार केला आणि अश्रद्धेच्या स्थितीतच प्राण सोडले, त्यांच्यापैकी एखाद्याने स्वतःला शिक्षेपासून वाचविण्यासाठी पृथ्वी भरून जरी सोने मोबदल्यात दिले तरी ते स्वीकारले जाणार नाही. अशा लोकांसाठी दुःखदायक शिक्षा तयार आहे. आणि त्यांना आपला कोणीही सहायक आढळणार नाही.
- तुम्ही जोपर्यंत (अल्लाहच्या मार्गात) तुमच्या सर्वाधिक प्रिय वस्तू खर्च करत नाही; तोपर्यंत तुम्ही पुण्य प्राप्त करू शकत नाही. जे काही तुम्ही खर्च कराल त्याविषयी अल्लाह सर्वज्ञ आहे.
- खाण्याच्या या सर्व वस्तू (ज्या इस्लामी धर्मकायद्यात वैध आहेत) बनीइस्राईलकरितादेखील वैध होत्या. तथापि काही वस्तू अशा होत्या ज्या तौरात उतरण्यापूर्वी इस्राईल (हजरत याकूब - अ.) ने स्वतः होऊन आपल्याकरिता निषिद्ध मानल्या होत्या. त्यांना सांगा, जर तुम्ही (आपल्या आक्षेपात) खरे असाल तर आणा तौरात आणि प्रस्तुत करा त्यातील एखादे उदाहरण
- यानंतरदेखील जे लोक स्वरचित खोट्या गोष्टींचा संबंध अल्लाहशी जोडत राहतील तेच वास्तविकपणे अत्याचारी आहेत.
- सांगा, अल्लाहने जे काही फर्माविले आहे ते सत्य फर्माविले आहे. तुम्ही एकचित्त होऊन इब्राहीम (अ.) च्या पद्धतीचे अनुकरण करावयास हवे आणि इब्राहीम (अ.) मुश्रिकां-(अनेकेश्वरवादीं) पैकी नव्हता.
- निःसंशय सर्वप्रथम उपासनास्थळ जे मानवाकरिता बांधण्यात आले ते तेच आहे जे मक्का शहरी विद्यमान आहे. त्याला मांगल्य व समृद्धीने संपन्न (दिली गेली आणि) सर्व जगवासियांकरिता मार्गदर्शनाचे केंद्र (बनविले गेले).
- ज्यात स्पष्ट संकेतचिन्हे आहेत. इब्राहीम (अ.) चे प्रार्थनास्थान आहे, आणि त्याची अवस्था अशी आहे की जो त्यात दाखल होईल सुरक्षित झाला. लोकांवर अल्लाहचा हा हक्क आहे की या गृहापर्यंत पोहोचण्याची ऐपत आहे त्याने त्याची हजयात्रा करावी आणि जो कोणी या आदेशाचे पालन करण्यास नकार देईल त्याने समजून असावे की अल्लाह सकल जगवासियांपासून निरपेक्ष आहे.
- सांगा, हे ग्रंथधारकांनो! तुम्ही अल्लाहच्या गोष्टी मान्य करण्यास का नकार देता? ज्या कारवाया तुम्ही करीत आहात अल्लाह सर्वकाही पाहत आहे.
- सांगा, हे ग्रंथधारकांनो! हे काय तुमचे वर्तन आहे की जो अल्लाहच्या गोष्टी मान्य करतो त्यालादेखील तुम्ही अल्लाहच्या मार्गापासून रोखता आणि इच्छिता की त्याने वाकड्या मार्गाचे अनुसरण करावे, वस्तुतः तुम्ही स्वतः (तो सरळमार्गी असण्याबद्दल) साक्षी आहात. तुमच्या कारवायांपासून अल्लाह अनभिज्ञ नाही.
- हे श्रद्धावानांनो, जर तुम्ही या ग्रंथधारकांपैकी एका गटाची गोष्ट मान्य केलीत तर हे तुम्हाला श्रद्धेकडून पुन्हा अश्रद्धेकडे परत नेतील.
- तुमच्यासाठी अश्रद्धेकडे परतण्याला आता कुठे वाव उरला आहे जेव्हा तुम्हाला अल्लाहची वचने ऐकविली जात आहेत आणि तुमच्या दरम्यान त्याचा पैगंबर उपस्थित आहे? ज्याची बांधिलकी अल्लाहशी भक्कम असेल त्याला निश्चितच सरळ मार्ग मिळेल.
- हे श्रद्धावानांनो! अल्लाहचे भय बाळगा जसे भय बाळगले पाहिजे आणि तुम्हाला अशा अवस्थेत मरण यावे की तुम्ही अल्लाहचे आज्ञाधारक आहात.
- सर्वजण मिळून अल्लाहच्या दोरीस घट्ट धरून असा आणि आपसांत फाटाफूट होऊ देऊ नका. अलाहच्या त्या उपकाराची आठवण ठेवा, जो त्याने तुम्हावर केला आहे. तुम्ही एक दुसर्याचे शत्रू होता, त्याने तुमची मने जोडली आणि त्याच्या मेहेरबानी व कृपेने तुम्ही बंधू-जन झालात. तुम्ही अग्नीने भरलेल्या एका खड्ड्याच्या तोंडावर उभे होता, अल्लाहने तुम्हाला त्यापासून वाचविले. अशा प्रकारे अल्लाह आपली संकेतचिन्हे तुमच्यासमोर प्रकाशित करतो. कदाचित यामुळे तुम्हाला आपल्या कल्याणाचा सरळ मार्ग दिसावा.
- सद्वर्तनाचे आवाहन करणारा व चांगुलपणाचा आदेश देणारा, तसेच दुराचाराचा प्रतिबंध करणारा एक गट तुमच्यात अवश्य असला पाहिजे, अशा लोकांना साफल्य लाभेल.
- एखाद्या वेळी तुम्ही त्या लोकांसारखे होऊ नये जे गटागटात विभागले गेले आणि उघड उघड स्पष्ट सूचना मिळाल्यानंतर पुन्हा मतभेदांत गुरफटले. ज्यांनी हे वर्तन अवलंबिले ते त्या दिवशी कठोर शिक्षा भोगतील
- जेव्हा काहींचे चेहरे तेजःपुंज असतील तर काहींचे चेहरे काळवंडलेले असतील. ज्यांचे चेहरे काळवंडतील (त्यांना सांगण्यात येईल की) श्रद्धेची देणगी मिळाल्यानंतर अश्रद्धावंतांप्रमाणे वर्तन करता? बरे तर आता या कृतघ्नतेच्या मोबदल्यात प्रकोपाचा आस्वाद घ्या.
- उरले ते लोक ज्यांचे चेहरे तेजःपुंज असतील तर त्यांना अल्लाहच्या कृपाछत्राखाली जागा मिळेल आणि ते सदैव त्याच अवस्थेत राहतील.
- हे अल्लाहचे आदेश आहेत जे आम्ही तुम्हाला ठीकठीक ऐकवीत आहोत कारण अल्लाह जगवासियांवर अत्याचार करण्याचा कोणताही हेतू बाळगत नाही
- पृथ्वी आणि आकाशातील सार्या वस्तूंचा मालक अल्लाह आहे आणि सर्व व्यवहार अल्लाहच्याचपुढे सादर होतात.
- आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता. या ग्रंथधारकांनी श्रद्धा ठेवली असती तर ते त्यांच्याकरिता उत्तम होते. यांच्यात जरी काही लोक श्रद्धावंत देखील आढळतात तरी यांचे बहुतेक लोक अवज्ञा करणारे आहेत.
- हे तुमचे काही वाईट करू शकत नाहीत. जास्तीत जास्त फक्त थोडा त्रास देऊ शकतात. जर तुमच्याशी हे लढले तर लढाईत पाठ दाखवतील. मग असे लाचार होतील की यांना कोठूनही सहाय्य मिळणार नाही.
- यांच्या वाट्यास चहूकडे अपमान व तिरस्कारच आला. कोठे अल्लाहच्या हमीने अथवा मानवांच्या हमीने आश्रय मिळाला तर ही गोष्ट वेगळी आहे. हे अल्लाहच्या प्रकोपात वेढले गेले आहेत, यांच्यावर लाचारी व पराधीनता लादली गेली आहे. हे सर्व काही केवळ या कारणास्तव घडले आहे की हे अल्लाहच्या संकेत वचनांना नाकारीत राहिले आणि यांनी प्रेषितांची नाहक हत्या केली. हा त्यांच्या अवज्ञा व मर्यादाभंगाचा परिणाम आहे.
- परंतु सर्वच ग्रंथधारक सारखे नाहीत. यांच्यामध्ये काही लोक असे देखील आहेत जे सरळ मार्गावर कायम आहेत, रात्री अल्लाहच्या वचनांचे पठण करतात व त्याच्यापुढे नतमस्तक होत असतात.
- अल्लाह आणि मरणोत्तर दिनावर श्रद्धा बाळगतात, सदाचाराचा आदेश देतात व दुराचारापासून प्रतिबंध करतात आणि पुण्य कार्यात क्रियाशील असतात हे सदाचारी लोक आहेत.
- आणि जे पुण्य कार्य हे करतील त्याची अवहेलना केली जाणार नाही अल्लाह प्रकोपाला भिऊन वागणार्या लोकांना चांगलेच ओळखतो.
- उरले ते लोक ज्यांनी अश्रद्धेचे वर्तन अंगिकारले तर अल्लाहच्या विरोधात त्यांना त्यांची संपत्तीही काहीच उपयोगी पडणार नाही की त्यांची संतती, ते तर नरकात जाणारे लोक आहेत व नरकातच सदैव राहतील.
- जे काही ते आपल्या या ऐहिक जीवनात खर्च करीत आहेत त्याचे उदाहरण त्या वार्यासारखे आहे ज्याच्यात गारठा असावा आणि तो त्या लोकांच्या शेतीवरून वहावा ज्यांनी स्वतःवर जुलूम केला आहे, आणि तिचा नाश करून टाकावा. अल्लाहने यांच्यावर अत्याचार केला नाही, खरे म्हणजे हे स्वतःच आपल्यावर अत्याचार करीत आहेत.
- हे श्रद्धावंतांनो, आपल्या समाजाच्या लोकांशिवाय इतरांना आपले मर्मज्ञ बनवू नका, ते तुमच्या वाईटाच्या कोणत्याही संधीचा फायदा घेण्यात कसूर करीत नाहीत. तुम्हाला ज्या गोष्टीपासून हानी पोहचेल तीच गोष्ट त्यांना प्रिय आहे, त्यांच्या मनातील द्वेष त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो आणि जे काही त्यांच्या अंतःकरणात दडलेले आहे ते याहूनही भयंकर आहे. आम्ही तुम्हाला अगदी स्पष्ट सूचना देऊन टाकल्या आहेत, जर तुम्ही बुद्धीमंत असाल (तर यांच्याशी संबंध ठेवण्यात सावधगिरी बाळगा)
- तुम्ही त्यांच्याशी प्रेम करता परंतु ते तुमच्याशी प्रेम करीत नाहीत, खरे पाहता तुम्ही सर्व दिव्य ग्रंथांना मानता. जेव्हा ते तुम्हाला भेटतात तेव्हा ते म्हणतात की आम्हीदेखील (तुमच्या पैगंबराला व तुमच्या ग्रंथाला) मानले आहे, पण जेव्हा ते वेगळे होतात तेव्हा तुमच्याविरूद्ध त्यांच्या क्रोधाची अशी स्थिती असते की ते आपली बोटे चावू लागतात, त्यांना सांगा की आपल्या क्रोधाग्नीत स्वतः जळून मरा, अल्लाह मनात लपलेली रहस्ये देखील जाणतो.
- तुमचे भले होते तेव्हा यांना वाईट वाटते आणि तुमच्यावर एखादे संकट येते तर हे आनंदित होतात. परंतु यांची कोणतीही क्लृप्ती तुमच्याविरूद्ध परिणामकारक ठरू शकत नाही परंतु अट अशी की तुम्ही संयम दाखवावा आणि अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत रहावे. जे काही हे करीत आहेत त्यावर अल्लाह प्रभावी आहे.
- (हे पैगंबर-स. मुसलमानांच्या समोर त्या प्रसंगाचा उलेख करा) जेव्हा तुम्ही प्रातःकाळी आपल्या घरातून निघाला होता आणि (उहदच्या मैदानात) मुसलमानांना युद्धासाठी ठिकठिकाणी नेमत होता. अल्लाह सर्व गोष्टी ऐकतो व तो अत्याधिक माहिती राखणारा आहे.
- स्मरण करा जेव्हा तुमच्यापैकी दोन गट दुबळेपणा दाखवित होते, वास्तविक पाहता अल्लाह त्यांच्या मदतीसाठी उपस्थित होता आणि ईमानधारकांनी अल्लाहवर भिस्त ठेवली पाहिजे.
- बरे यापूर्वी बदरच्या युद्धात अल्लाहने तुम्हाला मदत केली होती खरे पाहता त्यावेळी तुम्ही फार दुर्बल होता. म्हणून तुम्ही अल्लाहच्या कृतघ्नतेपासून दूर राहा. आशा आहे की तुम्ही आता कृतज्ञ बनाल.
- हे पैगंबर (स.), स्मरण करा जेव्हा तुम्ही श्रद्धावंतांना सांगत होता, ’’काय तुमच्यासाठी ही गोष्ट पुरेशी नाही की अल्लाहने तीन हजार फरिश्ते उतरवून तुमची मदत करावी?’’
- निःसंशय जर तुम्ही संयम दाखविला आणि अल्लाहचे भय बाळगून काम केले तर ज्या क्षणी शत्रू तुमच्यावर चाल करून येईल त्याचक्षणी तुमचा पालनकर्ता (तीन हजारच नव्हे) पाच हजार सुसज्ज ईशदूतांद्वारे मदत करील.
- ही गोष्ट अल्लाहने तुम्हाला या कारणास्तव सांगितली आहे की तुम्ही खुश व्हावे आणि तुमची हृदये संतुष्ट व्हावीत, विजय व सहाय्य जे काही आहे ते अल्लाहकडूनच आहे जो अत्यंत शक्तिमान, बुद्धिमान व द्रष्टा आहे.
- (आणि ही मदत तुम्हाला तो यासाठी देईल) जेणेकरून अश्रद्धेच्या मार्गावर चालणार्यांची एक बाजू तोडून टाकील अथवा त्यांचा असा अपमानजनक पराभव करील की त्यांनी विफलतेने परास्त व्हावे.
- (हे पैगंबर-स.) निर्णयाच्या अधिकारात तुमचा कोणताही वाटा नाही. अल्लाहला अधिकार आहे हवे तर त्यांना माफ करावे, हवे तर त्यांना शिक्षा करावी कारण ते अत्याचारी आहेत.
- पृथ्वी व आकाशात जे काही आहे त्याचा मालक अल्लाह आहे, हवे त्याला त्याने क्षमा करावे व हवे त्याला यातना देईल. तो माफ करणारा व परम दयाळू आहे.
- हे श्रद्धावंतांनो! हे दाम दुप्पट व्याज खाण्याचे सोडून द्या आणि अल्लाहचे भय बाळगा, आशा आहे की सफल व्हाल.
- त्या आगीपासून स्वतःचा बचाव करा जी अश्रद्धावंतांकरिता तयार केली गेली आहे.
- अल्लाह आणि पैगंबरांचे आज्ञा पालन करा, अपेक्षा आहे की तुम्हावर दया केली जाईल.
- त्या मार्गावर धावत चला जो तुमच्या पालनकर्त्याची क्षमा व त्याच्या स्वर्गाकडे जातो ज्याचा विस्तार पृथ्वी व आकाशासमान आहे, आणि तो त्या ईशपरायण लोकांसाठी तयार केला गेला आहे.
- जे कोणत्याही स्थितीत आपली संपत्ती खर्च करतात, मग ते बिकट स्थितीत असोत अथवा चांगल्या स्थितीत, जे राग गिळून टाकतात व दुसर्याचे अपराध माफ करतात - असे सदाचारी लोक अल्लाहला अतिशय प्रिय आहेत-
- आणि ज्यांची स्थिती अशी आहे की जर त्यांच्याकडून एखादे अश्लील कृत्य घडल्यास किंवा एखादा गुन्हा करून त्यांनी स्वतःवर अत्याचार केल्यास त्यांना लगेच अल्लाहचे स्मरण होते आणि ते त्याच्याकडे आपल्या अपराधांची क्षमा-याचना करतात - कारण अल्लाहशिवाय इतर कोण आहे जो अपराध माफ करू शकतो- आणि ते समजूनउमजून आपल्या कर्मावर अडून बसत नाहीत
- अशा लोकांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ असा आहे की तो त्यांना माफ करील व अशा नंदनवनात त्यांना दाखल करील ज्यांच्याखाली कालवे वहात असतील आणि तेथे ते सदैव राहतील. किती छान मोबदला आहे सत्कृत्य करणार्यासाठी!
- तुमच्यापूर्वी अनेक कालखंड होऊन गेली आहेत. पृथ्वीवर फेरफटका मारून पहा त्या लोकांचा शेवट कसा झाला ज्यांनी (अल्लाहच्या आज्ञा व आदेशांना) खोटे लेखले.
- ही लोकांसाठी एक स्पष्ट व उघड विवेचन आहे आणि जे अल्लाहचे भय बाळगतात त्यांच्याकरिता मार्गदर्शन व उपदेश.
- वैफल्यग्रस्त होऊ नका, दुःखी होऊ नका, तुम्हीच प्रभावी ठराल जर तुम्ही श्रद्धावंत असाल.
- यावेळी जरी तुम्हाला आघात पोहचला आहे तरी यापूर्वी असाच आघात तुमच्या विरोधकांना देखील पोहचला आहे. हे तर कालचक्र आहे ज्याला आम्ही लोकांदरम्यान भ्रमण करवीत असतो, तुमच्यावर ही वेळ अशासाठी आणली गेली की अल्लाह हे पाहू इच्छित होता की तुमच्यात खरे श्रद्धावंत कोण आहेत, आणि त्या लोकांना वेगळे करू इच्छित होता जे खरोखर (रास्त मार्गाचे) साक्षीदार आहेत. कारण अत्याचारी लोक अल्लाहला अप्रिय आहेत
- आणि तो या परीक्षेद्वारे श्रद्धावानांना वेगळे करून अश्रद्धावंतांना वठणीवर आणू इच्छित होता.
- तुम्ही अशी समजूत करून घेतली आहे काय की सहजपणे स्वर्गामध्ये दाखल व्हाल. वास्तविक पाहता अल्लाहने अद्याप हे पाहिलेलेच नाही की तुम्हापैकी ते कोण लोक आहेत जे त्याच्या मार्गात प्राण पणाला लावणारे आणि त्याच्यासाठी संयम बाळगणारे आहेत.
- तुम्ही तर मृत्यूची इच्छा करीत होता! पण ही त्यावेळेची गोष्ट होती जेव्हा मृत्यू समोर आलेला नव्हता, तर घ्या, तो तुमच्यासमोर आलेला आहे आणि तुम्ही त्याला डोळ्याने पाहिले.
- मुहम्मद (स.) याशिवाय काही नाहीत की ते केवळ एक प्रेषित आहेत, त्यांच्यापूर्वी इतर प्रेषित देखील होऊन गेले आहेत, मग काय जर ते मरण पावले अथवा त्याना ठार केले गेले तर तुम्ही लोक मागच्या पावली परताल? लक्षात ठेवा! जे परत फिरले ते अल्लाहचे काहीही नुकसान करणार नाही, परंतु जे अल्लाहचे कृतज्ञ दास बनून राहतील तो त्यांना त्याचा मोबदला देईल.
- कोणीही सजीव अल्लाहच्या आज्ञेशिवाय मरू शकत नाही. मृत्यूची घटका तर लिहिली गेली आहे. जो कोणी ऐहिक लाभाच्या इराद्याने कार्य करील त्याला आम्ही इहलोकातच देऊ व जो कोणी परलोकातील लाभाच्या इराद्याने कार्य करील त्याला परलोकात लाभ मिळेल. आणि कृतज्ञता दाखविणार्यांना आम्ही त्याचा मोबदला अवश्य देऊ.
- यापूर्वी कित्येक प्रेषित असे होऊन गेले आहेत ज्यांच्यासह मिळून असंख्य ईशभक्तांनी युद्ध केले. अल्लाहच्या मार्गात जी संकटे त्यांच्यावर कोसळली त्यामुळे ते हताश झाले नाहीत, त्यांनी दुबळेपणा दाखविला नाही. ते (असत्यापुढे) नतमस्तक झाले नाहीत अशाच संयमी लोकांना अल्लाह पसंत करतो.
- त्यांची प्रार्थना केवळ हीच होती की, ’’हे आमच्या पालनकर्त्या, आमच्या चुका आणि उणीवांबद्दल क्षमा कर, आमच्या कार्यात तुझ्या मर्यादांचे जे काही उल्लंघन झाले असेल ते माफ कर, आमचे पाय स्थिर कर आणि अश्रद्धावंतांविरूद्ध आम्हाला मदत कर.’’
- सरतेशेवटी अल्लाहने त्यांना जगातील लाभदेखील दिले व त्याहून श्रेष्ठतर, परलोकांतील लाभ देखील प्रदान केले. अल्लाहला असेच सत्कर्मी लोक पसंत आहेत.
- हे श्रद्धावानांनो, जर तुम्ही त्या लोकांच्या इशार्यावर चालू लागला ज्यांनी अश्रद्धेच्या मार्गाचा अवलंब केला आहे तर ते तुम्हाला परत मागे नेतील आणि तुम्ही निराश व्हाल.
- (त्यांच्या गोष्टी चूक आहेत) सत्य असे आहे की अल्लाह तुमचा पाठीराखा व सहायक आहे आणि तो सर्वोत्तम सहाय्य करणारा आहे.
- लवकरच ती वेळ येणार आहे जेव्हा आम्ही सत्याचा इन्कार करणार्यांच्या मनावर दरारा बसवू यासाठी की त्यांनी अल्लाहबरोबर अशांना भागीदार ठरविले आहे ज्यांच्या भागीदार असण्यासंबंधी अल्लाहने कोणतीही सनद उतरविली नाही. त्यांचे शेवटचे ठिकाण नरक आहे आणि फारच वाईट आहे ते ठिकाण जे त्या अत्याचार्यांच्या नशिबी येणार आहे.
- अल्लाहने (समर्थन व सहाय्याचे) जे वचन तुम्हाला दिले होते ते तर त्याने पूर्ण केले. सुरवातीला त्याच्या हुकुमाने तुम्हीच त्यांना ठार करीत होता. पण जेव्हा तुम्ही दुबळेपणा दाखविला व आपल्या कार्यात आपापसांत मतभेद दाखविले, आणि ज्या क्षणी ती वस्तू अल्लाहने तुम्हाला दाखविली जिच्या प्रेमात तुम्ही गुरफटला होता (म्हणजे युद्धातील लुटीचा माल) तेव्हा तुम्ही आपल्या सरदाराच्या आज्ञेविरूद्ध गेला. - कारण की तुम्हापैकी काहीजण इहलोकाचे इच्छुक होते आणि काहीजण मरणोत्तर जीवनाची इच्छा बाळगून होते. - तेव्हा अल्लाहने तुम्हाला अश्रद्धावंतांच्या विरोधांत पराभूत केले की ज्यायोगे तुमची परीक्षा घ्यावी आणि सत्य असे आहे की असे असूनसुद्धा अल्लाहने तुम्हाला माफच केले कारण श्रद्धावंतांवर अल्लाह फार कृपादृष्टि ठेवतो.
- आठवा तो प्रसंग जेव्हा तुम्ही पळ काढीत होता, कोणाकडे वळून पाहण्याचे भान देखील तुम्हाला राहिले नव्हते, आणि पैगंबर तुमच्या पाठीमागून तुम्हाला हाक मारीत होता. तेव्हा तुमच्या त्या वागणुकीचा बदला अल्लाहने असा दिला की तुम्हाला दुःखापाठोपाठ दुःख दिले म्हणजे भविष्यकाळांत तुम्हाला हा धडा मिळावा की जे काही तुमच्या हातातून निघून जाईल अथवा जे संकट तुमच्यावर कोसळेल त्याच्यामुळे निराश होऊ नये, अल्लाह तुमच्या सर्व कृत्यांची खबर राखणारा आहे.
- त्या दुःखानंतर मग अल्लाहने तुम्हांपैकी काही लोकांवर अशी समाधानाची स्थिती पसरविली की ते पेंगू लागले. पण एक दुसरा गट ज्याच्यापाशी सर्व महत्व केवळ आपल्या स्वतःचेच होते, अल्लाहच्या बाबतीत तर्हेतर्हेचे अज्ञानपूर्ण ग्रह करू लागला जे संपूर्णपणे सत्याविरूद्ध होते. हे लोक आता म्हणतात, ’’या आदेश देण्याच्या कार्यवाहीत आमचादेखील काही वाटा आहे?’’ यांना सांगा, ’’(कोणाचाही कसलाही वाटा नाही) या कामाचे सर्व अधिकार अल्लाहच्या हातात आहेत’’ वास्तविक पाहता या लोकांनी आपल्या मनात जी गोष्ट लपवून ठेवली आहे ती तुमच्यासमोर प्रकट करत नाहीत. त्यांचा खरा उद्देश हा आहे की, ’’जर (नेतृत्वाचे) अधिकारांत आमचा काही वाटा असता तर तेथे आम्ही मारले गेलो नसतो.’’ यांना सांगा, ’’जर तुम्ही आपल्या घरात देखील असता तर ज्या लोकांचा मृत्यू लिहिलेला होता ते स्वतः होऊन आपल्या वध-स्थानाकडे निघून आले असते.’’ आणि हा प्रसंग ओढवला तो अशासाठी होता की जे काही तुमच्या मनांत लपलेले आहे, अल्लाहने त्याची परीक्षा घ्यावी आणि जे काही तुमच्या हृदयात आहे ते साफ करून टाकावे. अल्लाह मनांची स्थिती चांगलीच जाणतो.
- तुमच्यापैकी जे लोक सामन्याच्या दिवशी पाठ दाखवून गेले होते त्यांच्या या डळमळण्याचे कारण असे होते की, त्यांच्या काही उणीवांमुळे शैतानने त्यांचे पाय डळमळीत केले होते. अल्लाहने त्यांना माफ केले, अल्लाह फार क्षमाशील व सहनशील आहे.
- हे श्रद्धावंतांनो, अश्रद्धावंतांप्रमाणे गोष्टी करू नका ज्यांचे आप्तेष्ट व नातेवाईक एखादे वेळी जर प्रवासाला जातात अथवा युद्धात सामील होतात (आणि तेथे एखाद्या अपघाताला बळी पडतात) तर ते म्हणतात की जर ते आमच्याजवळ असते तर मारले गेले नसते अथवा त्यांची हत्या झाली नसती. अल्लाह अशा तर्हेच्या गोष्टींना त्यांच्या मनांतील शल्य व दुःखाचे कारण बनवून टाकतो. एरवी खरे पाहता मारणारा व जीवन देणारा तर अल्लाहच आहे आणि तुमच्या सर्व कृतीचा तोच निरीक्षक आहे.
- जर तुम्ही अल्लाहच्या मार्गात मारले गेला अथवा मेला तर अल्लाहची जी कृपा व क्षमा तुमच्या वाट्यास येईल ती त्या सर्व वस्तूपेक्षा जास्त उत्तम आहे, ज्या हे लोक जमा करतात.
- आणि मग तुम्ही मरा अथवा मारले जा कोणत्याही परिस्थितीत तुम्हा सर्वांना एकवटून अल्लाहकडेच रुजू व्हावयाचे आहे.
- हे पैगंबर (स.), ही अल्लाहची मोठी कृपा आहे की तुम्ही या लोकांसाठी फार कोमल स्वभावी ठरला आहात. एरवी जर तुम्ही एखादे वेळी शीघ्रकोपी स्वभावी व निष्ठूर असता तर हे सर्वजण तुमच्यापासून विभक्त झाले असते. यांचे अपराध माफ करा, यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करा, आणि धर्म-कार्यात यांनासुद्धा सल्लामसलतीत सहभागी ठेवा, मग जेव्हा एखाद्या मतावर तुमचा निश्चय दृढ होईल तेव्हा अल्लाहवर भरोसा करा, अल्लाहला ते लोक प्रिय आहेत जे त्याच्या भरवशावर काम करतात.
- अल्लाह तुमच्या मदतीला असेल तर कोणतीही शक्ती तुम्हावर वर्चस्व प्राप्त करणार नाही, आणि जर त्याने तुम्हाला सोडून दिले, तर त्यानंतर असा कोण आहे जो तुम्हाला मदत करू शकेल? तर मग जे खरे श्रद्धावंत आहेत त्यांनी अल्लाहवरच विश्वास ठेवला पाहिजे.
- कोणत्याही नबीचे हे काम असू शकत नाही की त्याने अपहार करावा - आणि जो कोणी अपहार करील तो आपल्या अपहारासहित पुनरुत्थानाच्या दिवशी हजर होईल, - मग प्रत्येक जीवाला त्याच्या कमाईचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावर काहीही जुलूम होणार नाही.
- बरे हे कसे शक्य आहे की जो मनुष्य नेहमी अल्लाहच्या मर्जीप्रमाणे वागणारा आहे तो त्या माणसाप्रमाणे कृत्ये करील जो अल्लाहच्या कोपाने वेढला गेला आहे, आणि ज्याचे अंतिम ठिकाण नरक आहे, जे अत्यंत वाईट स्थान आहे.
- अल्लाहपाशी दोन्ही प्रकारच्या माणसात कित्येक पटीचा फरक आहे आणि अल्लाह सर्वांच्या कृत्यांवर नजर ठेवतो.
- खरे म्हणजे श्रद्धावंतांवर अल्लाहने तर हे फार मोठे उपकार केले आहे की त्यांच्या दरम्यान खुद्द त्यांच्याचपैकी एक अशा पैगंबराला उभे केले जो त्याची संकेतवचने त्यांना ऐकवितो, त्यांच्या जीवनाला सावरतो आणि त्यांना ग्रंथ व विद्वत्तेची शिकवण देतो वास्तविक पाहता हेच लोक या पूर्वी उघडपणे मार्गभ्रष्ट झाले होते.
- आणि ही तुमची काय स्थिती आहे की जेव्हा तुमच्यावर संकट कोसळले तेव्हा तुम्ही म्हणू लागला की हे कोठून आले? वस्तुतः (बदरच्या युद्धात) याच्यापेक्षा दुप्पट संकट तुमच्याकरवी (विरूद्ध पक्षावर) कोसळलेले आहे. हे पैगंबर (स.), यांना सांगा, हे संकट तुम्ही स्वतःच ओढून घेतले आहे, अल्लाह प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे.
- जी हानी युद्धाच्या दिवशी तुम्हाला पोहोचली ती अल्लाहच्या आज्ञेने होती आणि ती यासाठी होती की अल्लाहने पाहावे की तुमच्यापैकी कोण श्रद्धावंत आहे
- आणि दांभिक कोण, ते दांभिक की जेव्हा त्यांना सांगण्यात आले, ’’या, अल्लाहच्या मार्गात युद्ध करा किंवा कमीतकमी (आपल्या शहराचे) रक्षण तरी करा,’’ तेव्हा म्हणू लागले, ’’जर आम्हाला माहीत असते की आज युद्ध होईल तर आम्ही अवश्य तुमच्याबरोबर आलो असतो.’’ ही गोष्ट जेव्हा ते सांगत होते तेव्हा ते श्रद्धेपेक्षा अश्रद्धेच्या अधिक जवळ होते. ते आपल्या मुखाने अशा गोष्टी सांगतात ज्या त्यांच्या मनामध्ये नसतात, आणि जे काही ते हृदयात लपवितात अल्लाह त्याला चांगलेच जाणतो.
- हे तेच लोक आहेत जे स्वतः तर बसून राहिले आणि यांचे जे भाईबंद लढावयास गेले आणि मारले गेले त्यांच्या संबंधाने यानी सांगून टाकले की जर त्यांनी आमचे म्हणणे ऐकले असते तर मारले गेले नसते. यांना सांगा की जर तुम्ही आपल्या या वचनांत खरे असाल तर स्वतः तुमचा मृत्यू जेव्हा येईल तेव्हा त्याला टाळून दाखवा.
- जे लोक अल्लाहच्या मार्गात ठार झाले त्यांना मृत समजू नका, ते तर खरे पाहता जिवंत आहेत, आपल्या पालनकर्त्यापाशी उपजीविका प्राप्त करीत आहेत,
- जे काही अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना दिले आहे त्यावर ते फार खूश आहेत, आणि समाधानी आहेत जे श्रद्धावंत त्यांच्या पाठीमागे जगात राहिले आहेत आणि अद्याप तेथे पोहचलेले नाहीत, त्यांच्यासाठीदेखील कोणत्याही भयाचे अथवा दुःखाचे कारण नाही.
- ते अल्लाहचे बक्षीस व त्याच्या कृपेबद्दल आनंदी व उल्हसित आहेत आणि त्यांना कळून आले आहे की, अल्लाह श्रद्धावंतांचा मोबदला वाया घालवीत नाही.
- ज्यानी जखमी होऊनसुद्धा अल्लाह व पैगंबरांच्या हाकेला ओ दिली त्यांच्यात जे लोक सदाचारी व पापभीरू आहेत, त्यांच्यासाठी मोठा मोबदला आहे.
- ज्यांना लोकांनी सांगितले की, ’’तुमच्याविरूद्ध मोठ्या फौजा गोळा झाल्या आहेत, त्यांची भीती बाळगा,’’ तर हे ऐकून त्यांची श्रद्धा अधिक वृद्धिंगत झाली आणि ते उत्तरले की, ’’अल्लाह आमच्यासाठी पुरेसा आहे आणि तोच सर्वोत्कृष्ट कार्यसिद्धीस नेणारा आहे.’’
- सरतेशेवटी ते परमश्रेष्ठ अल्लाहच्या देणगी व कृपेसह परतले, त्यांना कोणत्याही प्रकारची हानी देखील पोहचली नाही आणि अल्लाहच्या मर्जीनुसार चालण्याचे श्रेयदेखील त्यांना प्राप्त झाले, अल्लाह मोठा कृपा करणारा आहे.
- आता तुम्हाला कळून चुकले की तो खरे पाहता शैतान होता जो आपल्या साथीदारांचे तुम्हाला उगीचच भय दाखवीत होता म्हणून तुम्ही भविष्यात माणसांचे भय बाळगू नका माझे भय बाळगा जर तुम्ही खरोखर श्रद्धावंत असाल.
- (हे पैगंबर-स.) जे लोक आज अश्रद्धेच्या मार्गात खूपच धावपळ करीत आहेत त्यांच्या धावपळीने तुम्ही खिन्न होऊ नका, ते अल्लाहचे काहीही वाईट करू शकणार नाहीत. अल्लाहचा हेतू असा आहे की त्यांच्यासाठी मरणोत्तर जीवनात कोणताही वाटा असू नये, आणि सरतेशेवटी त्यांना कठोर शिक्षा मिळणार आहे.
- जे लोक श्रद्धा सोडून अश्रद्धेचे ग्राहक बनले आहेत निःसंशय ते अल्लाहचे काहीच नुकसान करीत नाहीत त्यांच्याकरिता दुःखदायक शिक्षा तयार आहे.
- त्यांना असे सैल सोडणे अश्रद्धावंतांनी आपल्या बाबतीत हितकारक समजू नये. आम्ही तर त्यांना याकरिता सैल सोडीत आहोत की यांनी पापाचे खूप मोठे ओझे जमा करावे. मग यांच्यासाठी भयंकर अपमानजनक शिक्षा आहे.
- अल्लाह श्रद्धावंतांना त्या परिस्थितीत कदापि राहू देणार नाही ज्या परिस्थितीत तुम्ही या वेळेस आढळता. तो पवित्र लोकांना अपवित्र लोकांपासून वेगळे केल्याशिवाय राहणार नाही. परंतु अल्लाहची ही प्रथा नाही की त्याने तुम्हाला परोक्षाची पूर्वसूचना द्यावी. (परोक्षाच्या गोष्टीची माहिती देण्याकरिता तर) तो आपल्या प्रेषितांपैकी ज्याला इच्छितो त्याची निवड करतो म्हणून (परोक्षाच्या गोष्टीच्या बाबतीत) अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर श्रद्धा ठेवा. जर तुम्ही श्रद्धा आणि ईशपरायणतेचे वर्तन स्वीकाराल तर तुम्हाला फार मोठा मोबदला लाभेल.
- ज्या लोकांना अल्लाहने आपल्या कृपेने उपकृत केले आहे, आणि मग ते कंजूषपणाने वागतात तर त्यांनी या भ्रमात राहू नये की हा कंजूषपणा त्यांच्यासाठी चांगला आहे. नव्हे, हे त्यांच्याकरिता अत्यंत वाईट आहे. जे काही ते आपल्या कंजूषपणाने गोळा करीत आहेत तेच पुनरुत्थानाच्या दिवशी त्यांच्या गळ्यातील जोखड बनतील. पृथ्वी व आकाशांचा वारसा अल्लाहकरिताच आहे, आणि तुम्ही जे काही करता अल्लाह त्याबाबत सर्वज्ञ आहे.
- अल्लाहने त्या लोकांचे विधान ऐकले जे म्हणतात की, अल्लाह गरीब आहे आणि आम्ही श्रीमंत आहोत. यांच्या या गोष्टी देखील आम्ही लिहून घेऊ आणि यापूर्वी जे ते प्रेषितांची नाहक हत्या करीत आले आहेत तेही त्यांच्या कर्मनोंदपत्रात नमूद आहे (जेव्हा निर्णयाची वेळ येईल तेव्हा) आम्ही यांना सांगू की आता नरकाच्या प्रकोपाचा आस्वाद घ्या.
- ही स्वतः तुमच्या हाताने केलेली कमाई आहे, अल्लाह आपल्या दासांसाठी अत्याचारी नाही.
- जे लोक म्हणतात की, अल्लाहने आम्हाला आज्ञा दिली आहे की, आम्ही कोणाही पैगंबराला तोपर्यंत मानू नये जोपर्यंत तो आमच्या समोर अशी कुर्बानी देत नाही जिचे (परोक्षातून येऊन) अग्नीने भक्षण करावे. त्यांना सांगा, माझ्यापूर्वी तुमच्याकडे अनेक पैगंबर उज्ज्वल निशाण्या घेऊन आले होते. ज्याच्याबद्दल तुम्ही सांगत आहात तो संकेत सुद्धा आणला होता. जर तुम्ही प्रामाणिक आहात तर त्या प्रेषितांची हत्या तुम्ही कशासाठी केली?
- आणि हे पैगंबरा (स.)! हे तुम्हाला खोटे ठरवित आहेत तसेच अनेक प्रेषितांना तुमच्यापूर्वी खोटे ठरविले गेले आहेत जे उघड-उघड संकेत आणि दिव्य पुस्तिका व प्रकाश प्रदान करणारे ग्रंथ घेऊन आले होते.
- सरतेशेवटी प्रत्येकाला मृत्यू आहे आणि तुम्ही सर्वजण आपापले पुरेपूर मोबदले कयामतच्या दिवशी प्राप्त करणार आहात. यशस्वी खर्या अर्थी तोच आहे जो तेथे नरकाग्नीपासून वाचेल व स्वर्गामध्ये दाखल केला जाईल. उरले हे जग, तर ही केवळ एक भुरळ पाडणारी बाब आहे.
- मुसलमानांनो, तुम्हाला प्राण व वित्त या दोन्हीच्या परीक्षा द्याव्याच लागतील, आणि तुम्ही ग्रंथधारक व अनेकेश्वरवाद्याकडून पुष्कळशा त्रासदायक गोष्टी ऐकाल. जर या सर्व स्थितीत तुम्ही संयम आणि ईशपरायणतेच्या वर्तनावर दृढ राहाल तर हे मोठे धाडसाचे कार्य होय.
- या ग्रंथधारकांना त्या कराराची देखील आठवण करून द्या जो अल्लाहने त्यांच्याकडून घेतला होता की तुम्हाला ग्रंथाची शिकवण लोकांत प्रसारित करावी लागेल, ती लपवून ठेवता कामा नये. पण त्यांनी ग्रंथाला पाठीमागे घातले आणि अल्पशा किंमतीवर त्याला विकून टाकले. किती वाईट व्यवहार आहे हा जो हे करीत आहेत.
- तुम्ही त्या लोकांना प्रकोपापासून सुरक्षित समजू नका जे आपल्या कृतीवर प्रसन्न आहेत आणि इच्छितात की अशा कार्याची प्रशंसा त्यांना लाभावी जे वस्तुतः त्यांनी केले नाहीत. खरोखर त्यांच्यासाठी दुःखदायक शिक्षा तयार आहे
- पृथ्वी आणि आकाशांचा सार्वभौम मालक अल्लाह आहे आणि त्याची सत्ता सर्वांवर प्रभावी आहे.
- पृथ्वी आणि आकाशांच्या उत्पत्तीमध्ये व रात्र आणि दिवसाच्या आळीपाळीने येण्यात त्या ज्ञानी लोकांसाठी फार संकेत आहेत,
- जे उठता बसता आणि पहुडले असता प्रत्येक स्थितीत ईश्वराचे स्मरण करतात आणि पृथ्वी आणि आकाशांच्या रचनेत मनन व चिंतन करतात. (ते उत्स्फूर्तपणे उद्गार काढतात) ’’हे पालनकर्त्या, हे सर्वकाही तू व्यर्थ व निरुद्देश्य बनविलेले नाही, व्यर्थ कर्म करण्यापासून तू पवित्र आहेस. मग हे पालनकर्त्या, तू आम्हाला नरकाग्नीच्या प्रकोपापासून वाचव,
- तू ज्याला नरकामध्ये घातले त्याला खरोखर मोठे अपमान व नामुष्कीत लोटले आणि मग अशा अत्याचार्यांचा कोणीही सहायक असणार नाही.
- स्वामी, आम्ही एका हांक देणार्याला ऐकले जो श्रद्धेकडे बोलवीत होता आणि सांगत होता की आपल्या पालनकर्त्याला माना, आम्ही त्याचे निमंत्रण स्वीकारले, तर हे आमच्या स्वामी, जे अपराध आमच्याकडून झाले आहेत त्याबद्दल क्षमा कर, ज्या वाईट गोष्टी आमच्यात आहेत त्यांना काढून टाक आणि आमचा अंत सदाचारी लोकांसमवेत कर.
- हे प्रभू जी वचने तू आपल्या प्रेषितांद्वारे केलेली आहेस ती आम्हासाठी पूर्ण कर आणि पुनरुत्थानाच्या दिवशी आम्हाला नामुष्की देऊ नकोस, निःसंशय तू वचनभंग करणारा नाहीस.’’
- उत्तरादाखल त्यांच्या पालनकर्त्याने फर्माविले, ’’मी तुमच्यापैकी कोणाचेही कृत्य वाया घालविणार नाही मग तो पुरुष असो अथवा स्त्री, तुम्ही सर्वजण परस्परांशी संबंधित आहात, म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी स्वदेश त्याग केला आणि ज्यांना माझ्या मार्गात आपल्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि जे छळले गेले आणि माझ्यासाठी लढले व मारले गेले - त्यांचे सर्व अपराध मी माफ करून टाकीन व त्यांना अशा उपवनांत दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील. हा त्यांचा मोबदला आहे अल्लाहजवळ आणि सर्वोत्तम मोबदला अल्लाहजवळच आहे.’’
- हे पैगंबर (स.), शहरांमध्ये अश्रद्धावानांच्या धावपळीमुळे तुमची दिशाभूल होता कामा नये.
- ही केवळ काही दिवसांच्या जीवनाची थोडीशी मौज आहे, नंतर ते सर्वजण नरकामध्ये जातील जे अत्यंत वाईट ठिकाण आहे.
- याउलट जे लोक आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगून जीवन व्यतीत करतात त्यांच्यासाठी अशी उद्याने आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहतात, त्या उद्यानांत ते सदैव राहतील, अल्लाहतर्फे ही त्यांच्यासाठी मेजवानीची सामग्री होय, आणि जे काही अल्लाहजवळ आहे सदाचारी लोकांकरिता तेच सर्वोत्तम आहे.
- ग्रंथधारकांमध्येसुद्धा काही लोक असे आहेत जे अल्लाहला मानतात, या ग्रंथावर श्रद्धा ठेवतात जो तुमच्याकडे पाठविण्यात आला आहे आणि त्या ग्रंथावर देखील श्रद्धा ठेवतात जो याच्यापूर्वी खुद्द त्यांच्याकडे पाठविण्यात आला होता, अल्लाहच्या समोर विनम्र झालेले आहेत, आणि अल्लाहच्या संकेतवचनांना अल्पशा किंमतीला विकून टाकीत नाहीत, त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ आहे आणि अल्लाह हिशेब चुकता करण्यात विलंब लावीत नाही.
- हे श्रद्धावंतांनो, संयम पाळा, असत्यवाद्यांविरूद्ध दृढता दाखवा, सत्याच्या सेवेसाठी कटिबद्ध रहा व अल्लाहचे भय बाळगा, आशा आहे की तुम्ही सफल व्हाल.